Thursday, February 7, 2019

८. सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फांकलें



सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फांकलें ।
ते व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय ॥१॥
कमलनयन सुमन फांकलें ।
त्या परिमळा आथिलें । मकरंदी वो माय ॥२॥
संकोचला संसार । पारूषला व्यवहार ।
ब्रह्मानंद अपार । जहाला वो माय ॥३॥
मधुर वेदवाणी । न पवे ज्याच्या गुणीं ।
तें ठकावलें निर्वाणीं । नेति मुखें वो माय ॥४॥
या परतें बोलणें । न बोलणें होणें ।
तें म्यां आपुल्या अंगवणें । केलें वो माय ॥५॥
ऐसियातें वोठी । लागलें तयाचे पाठीं ।
रखुमादेविवरा भेटी । विठ्ठलीं वो माय ॥६॥

भावार्थ
श्रीहरीच्या या ओतीव सगुण रूपात परब्रह्माचे तेज फाकलेले आहे. त्यामुळे ते अत्यंत सुंदर व सुरेख दिसत आहे. आकाशात आकाश सामावून जावे तसे हे रूप माझ्या डोळ्यांत साठवले आहे ग माय.(१) याचे कमळासारखे डोळे कमळ उमलावे तसे पूर्ण उघडलेले असून ते सुगंधाने व मधाने परिपूर्ण आहेत.(२) हे रूप पाहिल्यामुळे माझा संसार संपला, व्यवहार थांबला आणि अपार असा ब्रह्मानंद लाभला.(३) अत्यंत मधुर अशी वेदवाणी याचे गुण गाण्यास असमर्थ ठरली आणि शेवटी तीही ‘नेति नेति’ म्हणत कुंठित झाली.(४) आता यापुढे त्याच्याविषयी काही बोलणे म्हणजे न बोलणेच होय. कारण त्या रूपाला मी माझे अंगच करून घेतले आहे.(५) अशा श्रीहरीचे सतत स्मरण करीत माझे दोन ओठ त्याच्या पाठीशी लागले आहेत. तो रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल मला भेटला ग माय.(६)

विवरण
श्रीहरीच्या सगुण रूपसौंदर्याने ज्ञानदेवांचे सौंदर्यान्वेषी मन अगदी वेडावून गेले आहे. बाहेर सौंदर्यशोधक दिठी आणि आत अद्वैताची मिठी अशी ज्ञानदेवांची अवस्था झालेली आहे. सारस्वताने दुभणार्‍या कविमनाला आत्मसाक्षात्कार झाला की काय घडते याचे ज्ञानदेव हे मूर्तिमंत उदाहरण आहे. सरस्वती जिव्हेवर बसलेली, मग आतून फुटणार्‍या सुखोर्मीला शब्दरूप लाभले नाही तरच नवल! त्यातही विटेवरले सावळे परब्रह्म हाती लागलेले. प्रतिभेला आवाहन करणारा एवढा उत्तम आणि उदात्त विषय मिळालेला. मग जन्मतः नक्षत्रांचे देणे घेऊन आलेल्या ज्ञानदेवांची रसवंती अधिकाधिक रसाळ होणार नाही तर काय! श्रीविठ्ठलाच्या सगुण-निर्गुण रूपाचे लावण्य वर्णिताना ज्ञानदेव अत्यंत तन्मय होतात. विठ्ठलाच्या लावण्याने ज्ञानदेवांच्या शब्दांना सौंदर्य लाभले की ज्ञानदेवांच्या शब्दांनी विठ्ठलाचे लावण्य झळाळून गेले, असा प्रश्‍न रसिक-आस्वादकांना पडावा अशी इथली स्थिती आहे.
परब्रह्माचे कृष्णरूप मोठे विलोभनीय. त्याच्यात जणू सौंदर्य ओतलेले आहे. सुवर्णाचा रस साच्यात ओतून एखादी ओतीव मूर्ती घडवावी तसे. सौंदर्य ओतून जणू कृष्णरूप घडवले आहे. सौंदर्यात सुरेखता असते. किंबहुना, जे सुरेख असते तेच सुंदर असते. आकृती म्हणजे एक रेखाच असते. ही रेखा पुरेशी वक्र झाली की ‘सु-रेख’ होते. व्यवहारात सरळपणाला महत्त्व असले तरी चित्रकलेत वक्रता महत्त्वाची असते. रेखा वक्र झाली नाही तर वर्तुळ होणार नाही. रेखेने वक्र होणे नाकारले तर ती सु-रेख होणार नाही. ज्या व्यक्तीची शरीररेखा वक्र असते त्या व्यक्तीचे शरीरसौष्ठव उठून दिसते. अशा व्यक्तीलाच आपण सुंदर म्हणू लागतो. सौंदर्य केवळ चरबी-चर्मात नसते, ते असते शरीररेखेच्या वक्रतेत. ‘सिंहकटी’ हे पूर्वसूरींनी सांगितलेले सौंदर्यलक्षण शरीररेखेची वक्रताच सूचित करते.

शरीररेखेची ही वक्रता, सु-रेखता कृष्णाच्या ठायी तर पूरेपूर आहे. त्याचे दिडक्या पायावर उभे असलेले, ओठाजवळ मुरली धरलेले रूप किती सुरेख, सुंदर आहे! विठ्ठलाचे विटेवर उभे असलेले ‘सुंदर ते ध्यान’ आठवून तर पाहा. दोन्ही पाय जोडून तो उभा आहे. अगदी ताठ, सरळ. दोन्ही हात फक्त कमरेवर ठेवलेले. परंतु तेवढ्यामुळे शरीररेखा वक्र होऊन किती सु-रेख झाली! ‘सुंदर ते ध्यान’ यापेक्षा या रूपाविषयी अधिक काय बोलावे? विठ्ठलाने कमरेवर हात काढून ते सरळ ठेवले आहेत अशी कल्पना करून पहावी, मग कमरेवरच्या हातांनी सौंदर्याला कसा उठाव मिळाला हे ध्यानात येईल. श्रीहरी असा ‘सु-रेख’ आहे. म्हणून सुंदर आहे. कृष्णरूपाची ही सुंदर सुरेखता किंवा सुरेख सुंदरता ज्ञानदेवांच्या सौंदर्यदृष्टीत भरून राहिलेली आहे.

असे सुंदर, सुरेख ओतीव रूप. त्यातून परब्रह्माचे तेज फाकलेले आहे. त्यामुळे ते अधिकच सुंदर झाले आहे. बोलणे साधे नसावे. बोलण्यात कवित्व असावे, कवित्वात रसिकता असावी आणि रसिकतेला परतत्त्वाचा स्पर्श व्हावा. मग ते बोलणे साधे राहत नाही, अतीव रसाळ आणि प्रतीतीचे बोलणे होते. त्याप्रमाणे आधीच सौंदर्य परंतु त्यातून परब्रह्माचे तेज फाकत असेल तर ते अतीव सुंदर होते. श्रीहरीचे तेजःपुंज सौंदर्य पाहताना ज्ञानदेवांची स्थिती कशी झाली? तर आकाशात आकाश सामावून जावे तसे श्रीहरीरूप त्यांच्या डोळ्यांत साठवले. आकाशात आकाश कसे सामावते? दुधात पाणी किंवा पाण्यात दूध सामावते तसे? दूध आणि पाणी दोन भिन्न द्रवपदार्थ आहेत. त्यांच्या कमी-अधिक मिश्रणाने दूध पाणचट होईल किंवा पाण्याला दुधाचा रंग येईल एवढेच. हे काही एकरूप होणे नव्हे. आकाशाचे तसे नाही. आकाश एकच आहे. भिंती बांधून घर उभे केले की आकाश वेगळे झाले आहे असे भासते. घरातले आकाश वेगळे आणि बाहेरचे आकाश वेगळे. भिंती पडल्या तर घरातले आकाश बाहेरच्या आकाशात कसे सामावून जाईल? सामावून जायला ते वेगळे होतेच कुठे? ते तर एकच होते. भिन्न भासत होते एवढेच. त्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या डोळ्यांत श्रीहरी सामावला. आकाशात आकाश सामावून जावे तसा. ज्ञानदेवांच्या दिठीत असे अद्वैत संचलेले आहे.

त्याचे डोळे कसे कमळासारखे टपोरे. कमळाच्या पाकळ्या उमलाव्या तसे पूर्ण उघडलेले. कमळात असतो गंध आणि मध. त्यामुळेच तर भ्रमर कमळाकडे आकर्षित होतो. कमळाच्या प्रेमात पडतो. इतका की रात्री कमळ मिटल्यावर तो आत चुकून राहिला तर रात्रभर तेथेच राहतो, जीव देतो. परंतु कमळाची एवढीशी पातळ पाकळी छेदून तो बाहेर येत नाही, त्याच्याजवळ कोरडे काष्ठ भेदण्याचे सामर्थ्य असले तरी. प्रेमाची जाती ही अशी असते. कमळाच्या गंधाने आणि मधाने लावलेले हे वेड. श्रीहरीचे डोळेही भक्ताला असेच वेड लावतात. त्याच्या डोळ्यांत प्रेमाचा गंध आणि भक्तीचा मध भरलेला आहे. त्याच्या डोळ्यांतून प्रेम-भक्तीचा नित्य वर्षाव होत असतो. या प्रेम-भक्तीसाठीच तर भक्त आपला जीव गहाण टाकतात. श्रीहरीच्या ठायी सुंदर रूप आहे, प्रेमाचा गंध आहे आणि भक्तीचा रस आहे. भक्तीचा अवीट स्वाद चाखण्यासाठी संतांनी पुन्हा पुन्हा गर्भवास पत्करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. श्रीहरीचे रूप जसे सुंदर आहे तसेच सुगंधित आणि रसपूर्णदेखील आहे, याची ज्ञानदेवांना अनुभूती आलेली आहे.

त्याच्या डोळ्यांतल्या रस-गंधाने असे वेड लागले आहे की संसार सरला आणि व्यवहार थंडावला. चार भांडी मिळवून घरात थाटलेला आणि मुला-लेकरांची वीण वाढवत बसलेला संसार म्हणजे हा संसार नव्हे. ‘संसार’ म्हणजे जन्ममरणाचे अखंड भ्रमणारे चक्र. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननिजठरे शयनम्’ अशी शंकराचार्यांनी वर्णिलेली स्थिती म्हणजे ‘संसार’ होय. जन्म हवा पण मृत्यू नको, असे म्हणता येत नाही. वाढदिवसाला फुंकर घालून मेणबत्त्या विझवल्यावर आयुष्यातली एवढी वर्षे विझून गेली हे तत्त्व ज्याला कळते आणि वळते तो खरा तत्त्वज्ञ. सामान्य माणूस मात्र जन्माचा आनंद साजरा करतो आणि मरणाचे दुःख जन्मभर वागवत बसतो. त्याला जन्म हवा असतो, मरण नको असते. परंतु असे तर कधी घडले नाही. सूर्याने उगवायचे पण मावळायचे नाही, फुलाने उमलायचे पण कोमेजून जायचे नाही, हे कसे घडेल बरे? मावळणे नको असेल तर उगवणे नाकारायला हवे, कोमेजणे नको असेल तर उमलणे नाकारायला हवे. मरणे नको असेल तर जन्मणे टाळायला हवे. मरण नाकारून उपयोग नाही, जन्म नाकारणे महत्त्वाचे. जेव्हा मनुष्य जन्म नाकारतो तेव्हा त्याच्या ‘संसारा’चा संकोच सुरू होतो. ‘संकोचला संसार’ या ज्ञानदेवांच्या शब्दांचा अर्थ असा आहे. श्रीहरीशी एकरूप झाल्यावर संसार उरेलच कसा? आणि व्यवहार तरी कसा चालू राहील? व्यवहारासाठी द्वैत हवे असते, कोणी पाहणारा असतो, काही पाहण्याजोगे असते. अशावेळी पाहण्याचा व्यवहार घडत असतो. कोणी कर्ता असतो, काही करण्यासारखे असते, तेव्हा कर्मव्यवहार होत असतो. येथे तर द्वैत उरलेलेच नाही, मग कोणी कोणाशी व्यवहार करायचा? अशाप्रकारे सारा व्यवहार थांबला आहे आणि अंतर्यामी तर असा ब्रह्मानंद उचंबळतो आहे की सांगता सोय नाही. तेजाला तेजाचेच अंग असावे तसा अवघा देह ब्रह्मानंदमय होऊन गेला आहे. ब्रह्मानंदामुळे देहभावच उरला नाही तर देहभान कसे राहील? ज्योतीचा प्रकाश काचेतून बाहेर फाकावा तसा ज्ञानदेवांचा आत्मानंद त्यांच्या मनातून, शरीरातून आणि वाणीतून प्रकट झाला आहे.

या ब्रह्मानंदाची प्राप्ती ज्याच्यामुळे होते त्या परब्रह्म श्रीहरीचे गुणगान कसे करावे बरे? वेदांनी हा प्रयास करून पाहिला. खरे तर वेदवाणी ही अत्यंत मधुर. कारण तिचा वर्ण्यविषयच मुळी अतीव मधुर आहे. विश्‍वातले सारे माधुर्य ज्यापासून उत्पन्न झाले ते परतत्त्व काय कमी मधुर आहे? लाडवातली गोडी ही रव्याची, बेसनाची नसते तर ती त्यामधल्या साखरेची असते, हे शहाण्याला कळते. त्याप्रमाणे विश्‍वात जे माधुर्य प्रत्ययाला येते ते त्या परमात्म्याचे असते. अशा मधुर परतत्त्वाचे वर्णन करू पाहणारी, त्याला स्पर्श करणारी वेदवाणी मधुर असणार नाही तर काय! परंतु वेदवाणीसुद्धा त्याच्या गुणांचा शोध घ्यायला असमर्थ ठरली आणि त्याचे एवढे गुणवर्णन करूनदेखील अखेर ‘न इति न इति’- अजून संपले नाही, अजून संपले नाही- असे म्हणत मूक झाली. ज्याला ‘शब्दब्रह्म’ म्हणतात त्या वेदांची ही अशी अवस्था. तेथे आपण त्याच्याविषयी काय बोलावे? म्हणून यानंतर त्या श्रीहरीविषयी काही बोलणे म्हणजे न बोलल्यासारखेच आहे. परब्रह्माचे वर्णन करण्यापेक्षा स्वतः परब्रह्म होणे हे अधिक सोपे आहे. म्हणून त्या परब्रह्म श्रीहरीला मी माझे अंगच करून घेतले आहे, असे ज्ञानदेव म्हणतात.

परंतु ‘श्रीहरीचे अंग होणे’ घडते तरी कसे? तर ओठांनी त्याच्या पाठीशी लागल्यावर. ओठांनी त्याचा पाठलाग केल्यावर. ओठांनी पाठीशी लागणे म्हणजे त्याचे निरंतर नामस्मरण करणे. नामस्मरण हे प्रारंभी पोपटपंचीसारखे भासते, क्षुद्र पाठांतर वाटते. परंतु पुढे ते हळूहळू मनात उतरते, मनाला व्यापून टाकते. वाल्ह्याचा वाल्मीकी करण्याची किमया नामस्मरणात आहे. नाम घेत घेत श्रीहरीच्या पाठीशी लागल्यावर पुढे श्रीहरीचे रूपच नाम घेणार्‍याच्या पाठीशी लागते. ज्याचा आपण पाठलाग करावा तोच पुढे आपला पाठलाग करू लागतो, असा येथला उलटा प्रकार आहे. शिपाई होऊन ‘पंढरीच्या चोरा’ला धरायला जावे तर तोच आपल्या अवतीभोवती सर्वत्र वावरत आपल्याला नजरकैदेत ठेवतो. म्हणून ओठांनी पाठलाग केल्यावर श्रीविठ्ठलाची भेट झाली, असे कृतार्थ उद्गार ज्ञानदेवांनी काढले आहेत.
ज्ञानदेवांचा हा अभंग म्हणजे एक आत्मसंवाद आहे. भूक भागल्यावर देखील वासराने गायीच्या आचळाशी लडिवाळ सलगी करावी तसा हा अभंग. ज्ञानदेव स्वतः पूर्ण तृप्त आहेत आणि अशा उच्च भूमिकेवर आरूढ झालेले आहेत की जेथे शब्दांचे काम नाही. परंतु कारण नसताना बोलत राहणे आणि जे रूप पाहिले ते पुन:पुन्हा पाहणे अशी प्रेमाची रीतच असते. तान्ह्या बाळाकडे कितीही टक लावून पाहिले तरी आईचे मन भरत नाही. मातृत्वाने कृतार्थ होऊन देखील ती बाळाकडे एकटक बघत, त्याचे कौतुक करीत जणू मायपणाचे सुख पुन:पुन्हा भोगत असते. ज्ञानदेवांची अवस्था अशीच झाली आहे. आत्मानुभवाने कृतार्थता लाभलेली, तरी अभंगाचे निमित्त करून आत्मसंवाद करीत ते अद्वैतानंद पुन:पुन्हा अनुभवत आहेत, असे सारखे वाटत राहते.

@ शे. दे. पसारकर 
1997 

७. कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु


पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळा फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेज:पुंजाळलें । न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु । येणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु । हें तव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणे खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगे ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठीमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तवं मीचि मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥

भावार्थ
या पांडुरंगाचे अंग दिव्य तेजाने कसे झळकत आहे पाहा. जणू रत्नांचे तेजच सर्वत्र फाकले आहे. येथे जे तेज:पुंज लावण्य प्रकटले आहे त्याचे वर्णनच करता येत नाही.(१) जाणण्यास कठीण असलेला हा विठ्ठल कर्नाटकातला असून ज्याने मला वेध लावला आहे, तो खोळ पांघरून मला खुणावून बोलवीत आहे. परंतु आळवल्यावर मात्र साद देत नाही.(२) याच्याशी शब्दांशिवाय संवाद करावा लागतो, दुजेपणा न ठेवता बोलावे लागते हे किती गंमतीचे आहे बरे! याच्याशी बोलताना परावाणी थकून जाते, तेथे वैखरीचा काय पाड?(३) याच्या पाया पडायला जावे तर त्याचे पाऊलच दिसत नाही, दृष्टिसमोर मात्र उभा असलेला दिसतो. हा समोर आहे की पाठीमागे आहे हेच कळत नाही, असा भ्रम कसा झालाय कुणास ठाऊक!(४) याला मिठी मारण्यासाठी माझा जीव उतावळा होतो, त्यासाठी माझे बाहू स्फुरण पावतात. त्याला कडकडून मिठी मारायला जावे तर समोर कुणीच नाही, मी एकटीच उभी आहे, असा अनुभव येतो. त्याच्या भेटीसाठी माझा जीव किती आशा लावून बसला आहे!(५) हा बाप, रखुमादेवीचा पती माझ्या हृदयातच आहे असे जाणून त्याचा अनुभव घेण्याचा मी निश्‍चय केला. ज्ञानदृष्टीने त्याला पाहायला गेले तर माझ्या अंत:करणात एकाएकी पालट होऊन तो मला सापडला.(६)

विवरण
श्रीविठ्ठलाच्या तेजस्वी रूपाचे, त्याच्या झळाळणार्‍या अंगकांतीचे बहारदार वर्णन ज्ञानदेवांनी या अभंगात केले आहे. हे जसे विठ्ठलाचे वर्णन आहे तसेच ज्ञानदेवांच्या पालटलेल्या अंत:करणाचेही आहे. हा सावळा विठ्ठल ज्ञानदेवांना किती रूपांनी भेटतो आहे! कधी रत्नकांतीसारखे तेजस्वी रूप घेऊन, तर कधी आपले अगम्यत्व जपत ‘कानडा’ होऊन. कधी विश्‍वाची खोळ पांघरून लपत-खुणावत, तर कधी आळवल्यावर साद न देण्याचा हटवादीपणा करत. समोर उभा असूनही ‘समोर की पाठमोरा’ असे संभ्रमात पाडत ठकवून तर कधी उतावीळपणे क्षेम देताना अदृश्य होऊन. असे या विठ्ठलाचे लीलालाघव! त्याला पाहता पाहता अंत:करण कसे पालटून जाते आणि ‘मीचि मी एकली’ असा एकत्वाचा अनुभव कसा येतो, हे ज्ञानदेवांनी या अभंगात वर्णिले आहे. भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैताचे एवढे प्रत्ययकारी चित्रण अन्यत्र क्वचितच आढळेल.

या अभंगाचे एक वैशिष्ट्य असे की येथे ज्ञानदेव ‘स्त्री’ होऊन अद्वैताचा आनंद अनुभवत आहेत. ‘पाया पडूं गेले’- ‘क्षेम देऊं गेलें तवं मीचि मी एकली’- ‘दृष्टीचा डोळां पाहो मी गेलीये’ हे शब्दसमूह त्यांच्या स्त्री-भूमिकेचेच सूचन करतात. आपले पाहणे-वागणे-बोलणे-लिहिणे सारे ‘पुरुषी’ आहे. अगदी आत्म्याला सुद्धा सांख्य तत्त्वज्ञानाने ‘पुरुष’ अशी संज्ञा दिली आहे. ‘पुरुषार्थ’, ‘पौरुष’ या शब्दांतही ‘पुरुष’ दडलेला आहे. ऋषी, योगी, भक्त, संत हे सारे शब्द पुरुषवाचक आहेत. ज्ञानानुभवाच्या पातळीवर देखील माणूस आपले ‘पुरुषपण’ विसरत नाही. अनुभवाच्या प्रकटीकरणाची भाषादेखील पुरुषी असते. ज्ञानदेव जेव्हा स्त्री होऊन अनुभव घेतात आणि तसाच तो व्यक्त करतात तेव्हा हे सारे पुरुषही वर्चस्व ते नाकारत नाहीत ना? असे वाटत राहते. आपल्यातला पुरुषभाव क्षीण करण्याचा तर हा प्रयास नव्हे? उंबरठ्याच्या आत चिणलेली स्त्रीची करुण कहाणी आणि स्त्रीत्वाच्या नावाने शिमगा करणारे पुरुषी निसुगपण त्यांना चांगले परिचित असावे. पितृत्व सहज नाकारता येते पण मातृत्व कदापि नाकारता येत नाही, हे नैसर्गिक सत्य त्यांना ज्ञात होते. स्त्रीचा विलक्षण हळवेपणा आणि अनुभवाची प्रगाढता यांमुळे ज्ञानदेवांनी स्त्रीची भूमिका घेतली हे खरे असले तरी त्यातून पुरुषी व्यवस्थेविरुद्ध एक विद्रोहाचा सूर मंदपणे निनादत आहे, असे सारखे वाटत राहते. ज्ञानदेवांच्या संयमाला शोभेसा त्यांना क्रांतिकारकत्वाचा हा आणखी एक पैलू.

ज्ञानदेवांच्या दृष्टिपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळाळत असलेली त्यांना दिसते. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. त्यांची दृष्टी ज्यावर पडते ते दिव्य तेजाने झळाळून जाते. येथे तर तेजाचे तेज असलेला पांडुरंग विटेवर उभा आहे. त्याच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे सौंदर्य अगणित, असीम आहे आणि तेजःपुंजाळलेले आहे, प्रकाशाचे अंग प्रकाशाचेच असते त्याप्रमाणे.
हा विठ्ठल कसा आहे? तर कानडा आणि कर्नाटकी. ‘कानडा’ याचा एक अर्थ कन्नड भाषा बोलणारा असा आहे तर दुसरा अर्थ ‘अगम्य’ असा आहे. ‘विठ्ठल कानडे बोलु जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे’ असे नामदेवांनी म्हटले आहे. ‘कर्नाटकु’ या शब्दाचेही असेच दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे ‘कर्नाटक प्रांतातला’ तर दुसरा अर्थ आहे ‘नाटकी, करणी करणारा’ (करनाटकी). कन्नड आणि कर्नाटक यांच्याशी विठ्ठलाचा पूर्वापार संबंध असला तरी येथे ज्ञानदेवांना त्याचे अगम्यत्व आणि नाटकीपण सांगायचे आहे. हा विठ्ठल नाटकी आहे तसाच कानडा म्हणजे न कळणारा असा आहे. त्याचे सगुण-साकार रूप हे नाटक नाही तर दुसरे काय आहे? ठसठशीतपणे अनुभवाला येणारे हे विश्‍व, पशु-पक्षी-माणूस, सारे स्थिरचर... हे नाटकच चाललेले आहे. सगळ्यांच्या भूमिका हाच नाटकी विठ्ठल करीत आहे. त्याच्या या नाटकीपणानेच तर मी मोहून गेले आहे. या नाटक्याने मला असा वेध लावला आहे की सांगता सोय नाही. त्याच्या नाटकाला अंतपार नाही. तो या सगुण-साकार विश्‍वाचे पांघरूण आपल्या निर्गुण-निराकार अंगावर घेऊन बसलाय हळूच खुणावत. या विश्‍वामागे लपून तोच खुणा करून बोलावतो आहे एखाद्या लबाड मुलासारखा. ‘माझ्याकडे पाहा, मला ओळख’ असे खुणावतो तर आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ देत नाही. असा हा नाटकी. त्याच्या नाटकाबद्दल किती सांगावे! त्याच्या या नाटकीपणामुळेच तर तो ‘कानडा’ आहे. कळायला मोठा कठीण आहे.

याच्याशी संवाद करायचा तो शब्दांशिवाय. याच्याशी बोलायचे ते दुजेपण टाकून, हे कसे वाटते बरे? पण आहे मात्र खरे. बोलण्यापेक्षा अबोलणे बरेच काही सांगून जाते. प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत? आईने मुलाला ‘बाळा, तुझ्यावर माझे फार फार प्रेम आहे’ असे सतत म्हटले तरच तिचे प्रेम व्यक्त होते का? न बोलताही तिच्या दृष्टीत वात्सल्य ओथंबून राहिलेलेच असते. म्हणून या विठ्ठलाशी मौनाने बोलावे लागते, अन् तेही बोलणारा आणि ऐकणारा हे द्वैत सांडून. आपला प्रतिध्वनी आपणच ऐकावा तसे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा चतुर्विध वाणी आहेत. वैखरी ही बाह्य वाणी. वैखरी म्हणजे शब्दांत बोलणे. विचार करताना आपण आपल्याशी बोलत असतो, ती मध्यमा वाणी. तिच्या पलीकडे हृदयाची भाषा असते. ती हृदयालाच कळते, ती पश्यंती वाणी आणि आत्म्याच्या अत्यंत समीप असणारी, त्याच्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परावाणी. अशी परावाणीदेखील या विठ्ठलाशी बोलताना मूक होते. बोलणे खुंटते. शब्दांवाचून संवाद कसा होतो, दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते, हे जेथे परावाणीला सांगता येत नाही, तेथे वैखरीला कसे बरे सांगता येईल?

या विठ्ठलाचा नाटकीपणा आणखी किती सांगू? त्याच्या पायावर डोके ठेवायला जावे तर त्याचे पाऊलच दिसत नाही. समोर पाहावे तर तो हसत उभा असतो. याच्या रूपाला अंत ना पार. त्याचे पाऊल सापडेल तरी कसे? हा समोर आहे की पाठमोरा हेच कळत नाही. हा मला समोरून दिसत आहे की मी याची पाठीमागची बाजू पाहते आहे? हा माझ्यासमोर उभा आहे की माझ्या पाठीमागे उभा आहे? अशा संभ्रमात याने मला पाडले आहे. अशाप्रकारे हा मला सारखा ठकवतो आहे. हे विश्‍व याचेच रूप. ते आपण पुढून पाहतोय की मागून? खालून पाहतोय की वरून? काय समजावे बरे? आपल्या अवतीभोवती सर्वत्र तोच व्यापून राहिलेला आहे एवढे मात्र खरे.

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला. त्यासाठी माझे बाहू स्फुरण पावताहेत. मला वाटले हा एवढासा विठ्ठल. त्याला मिठी मारणे किती सोपे. अशा विचाराने त्याला मिठीत घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे विरून गेला कुणास ठाऊक? त्याला आलिंगन देण्याची माझी आस अपुरीच राहिली. हा विठ्ठल बाहेर नसून हृदयात वसतो आहे असे मला कळले तेव्हा त्याचा अनुभव घ्यायचे मी ठरवले. मग मी दृष्टी आत वळवून पाहिले तर काय, माझे अंतरंगच बदलून गेले! आत तोच, बाहेर तोच. समोर तोच, मागे तोच. देह तोच, आत्मा तोच. जिकडे पाहावे तिकडे तोच. विश्‍वात तोच, विश्‍वापलीकडे तोच. नाना रूपे घेऊन, नाना मुखवटे धारण करून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पाहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्‍चल उभा आहे! जणू काहीच करीत नाही. जणू कुणाचे काही घेणे-देणे लागत नाही. भोळा सांबच जसा. अरे, तुझ्यासारखा दुसरा नाटकी मी पाहिला नाही. विश्‍वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस, माझ्यासारखीला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय राहतोस, पाया पडायला आले तर पाऊल काय लपवतोस, समोर-मागे येऊन काय ठकवतोस, क्षेम द्यायला जाताच हृदयात काय लपतोस! कळली तुझी सारी नाटके! तू पक्का ‘करनाटकी’ आहेस आणि न कळणारा असा ‘कानडा’ आहेस हे आता पुरते कळले. बरं का!

ज्ञानदेव स्त्रीभावाने सर्वव्यापी विठ्ठलाशी असे बोलत राहतात. हे बोलणे म्हणजे एका अंगाने त्याच्याविषयी तक्रार आहे तर दुसर्‍या अंगाने त्याचा गुणगौरव आहे. एका अर्थाने हे विठ्ठलाच्या तेजःपुंज सगुण-निर्गुण रूपाचे वर्णन आहे, तर दुसर्‍या अर्थाने ज्ञानदेवांच्या पालटलेल्या अंतरंगस्थितीचे चित्रण आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध झाला आहे. पहिल्या कडव्यात विठ्ठलाचे तेजःपुंज रूप, दुसर्‍यात खोळबुंथी घेऊन खुणावणारे त्याचे नाटक, तिसर्‍या कडव्यात शब्दांपलीकडे असलेली त्याची भाषा, चौथ्यात समोर-मागे ठकवणारे त्याचे सर्वव्यापी अगम्य रूप, पाचव्या कडव्यात त्याला आलिंगन देताना अनुभवाला येणारे अद्वैत आणि सहाव्यात त्या हृदयस्थाचा साक्षात्कार झाल्यावर पालटलेले अंतरंग या सार्‍याचे ज्ञानदेवांनी अत्यंत रेखीव वर्णन केले आहे.
शे. दे. पसारकर
1997

Sunday, January 6, 2019

ज्ञानदेवांच्या अभंगाचे विवरण

६. बरवा वो हरि बरवा वो




बरवा वो हरि बरवा वो ।

गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥

सांवळा वो हरि सांवळा वो ।
मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥२॥
पाहातां वो हरि पाहातां वो ।
ध्यान लागलें या चित्ता वो ॥३॥
पढिये वो हरि पढिये वो ।
बाप रखुमादेविवरु घडिये वो ॥४॥


भावार्थ

हा श्रीहरी अत्यंत चांगला आहे. हाच गोविंद आहे, हाच गोपाळ आहे. याचे गुण किती थोर आहेत हो.(१) या हरीचा वर्ण सावळा आहे. हा कान्हा, गायी राखणारा गोपाळ मदनालाही मोहित करणारा आहे हो.(२) या हरीला पाहता पाहता माझ्या चित्ताला त्याचेच ध्यान लागून राहिले.(३) असा हा प्रिय श्रीहरी, हा बाप, रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल मला घडीघडी आवडतो हो.(४) 

विवरण
ज्ञानदेवांचा हा अभंग म्हणजे एक लयबद्ध भावकविताच आहे. वार्‍याच्या झुळुकीने वेल मंदपणे डोलत राहावी तसे हा अभंग वाचताना आपण डोलू लागतो. कवितेत एक अंतर्गत लय असते तशीच तिच्या बाह्य रूपात- शब्दरचनेत देखील एक लय असते. या अभंगात बरवा, सांवळा, पाहाता, पढिये या शब्दांच्या पुनरावर्तनाने ज्ञानदेवांनी अशी लय साधली आहे की अभंग वाचताना, गुणगुणताना हात नकळत ताल धरू लागतात. श्रीहरीचे रूप पाहिल्यावर ब्रह्मानंदी टाळी लागेल तेव्हा लागेल, परंतु अभंग वाचताक्षणी हातांची टाळी मात्र लगेच वाजू लागते. बरवा-गरुवा, सावळा-गोवळा, पढिये-घडिये अशा यमकांनी अभंगातली लय वाढत जाते आणि ‘वो’च्या आवर्तनाने ती अधिक गडद होते. भावकवी म्हणून ज्ञानदेवांचे अभंगाच्या आशयाकडे जेवढे लक्ष आहे तेवढेच अभंगाच्या बाह्य रूपाकडे देखील आहे. हृदयातला आशय-अनुभव अमूर्त असतो आणि तो शब्दांद्वारेच मूर्त होत असतो. म्हणून शब्दांचे देखणेपण, त्यांची योजना-आवर्तने यांविषयी ज्ञानदेव अतिशय सजग, सावध आहेत. ज्ञानदेवांची दृष्टी सौंदर्यशोधक आहे. तिला अमूर्तातले सौंदर्य दिसते तसेच मूर्तातलेही सौंदर्य दिसते. अभंगाच्या आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांकडे ते सौंदर्यवादी दृष्टीने पाहत आहेत.

वृंदावनात गायी राखणारा गोपालक श्रीहरी म्हणजे मूर्तिमंत सौंदर्यच! परब्रह्माचे सगुण सावळे रूप. परमात्म्याची निर्गुण आणि सगुण दोन्ही रूपे ज्ञानदेवांना प्रिय आहेत. निर्गुण-निराकार त्यांचा चिंतनविषय आहे तर सगुण-साकार प्रेमविषय. विश्‍वरूपाने विलसणारे परब्रह्म त्यांना प्रेमास्पद वाटते.


जालेंनि जगें मीं झाकें । तरी जगत्वे कोण फांके ।
किळेवरी माणिकें । लोपिजे काई ॥१४-१२३॥
असे ‘ज्ञानेश्‍वरी’त श्रीकृष्णाच्या मुखातून त्यांनी वदविले आहे. रत्नाची प्रभा रत्नाला झाकत नसते तर
प्रकट करीत असते, त्याप्रमाणे हे दृश्य जग परब्रह्माला झाकून टाकत नसून त्याला प्रकट करीत आहे.
ज्ञानदेवांची ही भूमिका समजून घेतली की मग ते संप्रदायाने निर्गुणोपासक असूनही सगुणावर एवढे
उत्कट प्रेम का करतात हे लक्षात येते.


ज्याच्या ठायी समग्र सौंदर्य एकवटलेले आहे असा श्रीहरी ज्ञानदेवांच्या भावविश्‍वात जागा झाला आहे. श्रीविठ्ठल हे त्याचेच रूप. तो निर्गुणच इथे सगुण झाला आहे. तो अरूपच इथे रूप घेऊन उभा आहे. त्याचे ‘बरवेपण’ काय सांगावे? ते पाहण्यासाठी कष्ट पडत नाहीत. पापण्या उघडल्या की हे सावळे सुंदर रूपडे दृष्टिसमोर उभे राहते. ते जणू डोळ्यांना आलिंगनच देते. म्हणून त्याचे सौंदर्य पाहताच ज्ञानदेवांची वाणी ‘बरवा वो हरि बरवा वो’ असे गुणगुणत राहते. याचे गुण किती थोर आहेत पाहा. कर्तृत्व, नियंतृत्व, भोक्तृत्व, विभुत्व, साक्षित्व आणि सर्वज्ञत्व हे षड्गुण याच्या ठिकाणी आहेत. विश्‍वातील समस्त कर्मांना हा प्रेरणा देतो. सर्व ब्रह्मांडांचे नियंत्रण करतो, शरीरात जीवरूपाने राहून सुखदुःखे भोगतो. हा सर्व विश्‍वाला व्यापून उरला आहे, हा सर्व जगव्यवहाराचा साक्षीदार आहे आणि हा सर्वज्ञ, सर्वज्ञानी आहे. त्याच्या अनंत ज्ञानाशी कोणी बरोबरी करू शकत नाही. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडे असलेला हा निर्गुण श्रीहरी असा स-गुण झाला आहे. सौंदर्य आणि गुण यांचा सुरेख संगम याच्या ठिकाणी झाला आहे. श्रीहरीचे सौंदर्य हे ईश्‍वरी सौंदर्य आहे. ते मानवी सौंदर्यासारखे क्षणभंगुर नाही. कालची लावण्यवती आज चेहर्‍यावर सुरकुत्या घेऊन हातातली काठी टेकत चालत असते. परंतु श्रीहरीचे सौंदर्य कालातीत आहे. ते ढळणारे नाही. कोणत्याही काळात, कोणत्याही प्रांतात ज्या कुणाच्या मनात भक्तीचा उदय होईल याच्या दृष्टिपुढे श्रीहरीचे हेच सौंदर्य प्रकट होईल.

श्रीहरी सावळ्या रंगाचा आहे. तो मेघश्याम आहे. सावळा मेघ सहस्रधारांनी बरसून भूमीला सुजलाम् सुफलाम् करतो. मेघासारखा उदार कोणी नाही. निरपेक्षपणे तो सतत देतच असतो. त्याच्या बरसण्याने असंख्य जिवांचे पोषण होते. श्रीहरीचा वर्ण मेघाप्रमाणे सावळा आहे. याचा अर्थ तो मेघासारखा उदार आहे. चातकाची तृषा एका पाऊसथेंबाएवढी. तो मागतो थेंबभर पाणी, पण मेघ देतो सहस्रधारा. अवघ्या भूमीला भिजवून चिंब करणार्‍या. विटेवरला श्रीहरीही असाच मेघोदार आहे. त्याला मागून तर पाहा. तो इतके देईल की ते जन्मभर पुरून उरेल. मात्र मेघाची कृपा हवी असेल तर चातक होता आले पाहिजे. श्रीहरी-माऊलीचा पान्हा हवा असेल तर तिचा तान्हा होता आले पाहिजे.

श्रीहरी सावळा असला तरी तो मदनालाही मोहित करणारा मोहन आहे. मदनाने तर सार्‍या जीवमात्रावर आपली विलक्षण मोहिनी घातलेली आहे. क्षणिक सुखासाठी त्याने युगायुगांची आयुष्ये गहाण ठेवून घेतली आहेत. राव असो की रंक, वज्रदेही भीमकाय असो की पाप्याचे पितर, सारेच या मदनाने दाखवलेल्या अतृप्त क्षणामागे धावत सुटलेले दिसतात. ज्ञानी-अज्ञानी, सज्जन-दुर्जन या सगळ्यांना मदनाने आपल्या दावणीला बांधलेले आहे. जन्मभराच्या तपस्येवर पाणी सोडून विश्‍वामित्र मेनकेच्या मागे धावत सुटतो, असा या मदनाचा प्रताप आहे. त्याला नाव कोणतेही द्या, पण तोच सार्‍या जगाला आपल्या भोवती नाचवतो आहे. असा अवघ्या जगाला मोहित करणारा प्रतापी मदन, पण त्यालाही हा श्रीहरी मोहित करतो. मदनाचे सर्व सामर्थ्य श्रीहरीपुढे निष्प्रभ होते.

हा कान्हा गायी राखणारा गोपाळ आहे, असे ज्ञानदेव वर्णन करतात. राखणे म्हणजे नियंत्रण ठेवणे, गायींच्या मागे रानोमाळ धावणे नव्हे. त्याच्या मुरलीच्या स्वरात गायी नियंत्रित करण्याचे सामर्थ्य आहे. मग या गायी म्हणजे विषयांपाठी धावणारी इंद्रिये असतील किंवा चंचल अशा अनावर चित्तवृत्ती असतील.

या श्रीहरीला पाहता पाहता ज्ञानदेवांचे नेत्र अलगद मिटतात आणि त्यांना या सावळ्या सुंदराचे ध्यान लागून राहते. आता डोळे उघडणे-मिटणे ही केवळ एक क्रिया उरली आहे. त्या सगुण-निर्गुण रूपाशी ज्ञानदेवांचे चित्त असे एकाकार झाले आहे की पाहते आणि पाहणे हा भेदच विरून गेला. सामान्य माणसाच्या लेखी डोळे उघडणे आणि डोळे मिटणे ही केवढी महत्त्वाची क्रिया असते! त्याचे डोळे उघडे असतील तेव्हा तो हे विश्‍व पाहत असतो आणि त्याचे डोळे जेव्हा बंद होतात तेव्हा तो मनोविश्‍व पाहत असतो. डोळे उघडून तो जेवढे पाहतो त्यापेक्षा डोळे बंद करून अधिक पाहत असतो. त्याच्या उघड्या डोळ्यांपुढील जग आणि मिटलेल्या डोळ्यांपुढील जग वेगळे वेगळे असते. परंतु ज्ञानदेवांनी डोळे उघडले काय किंवा डोळे मिटले काय, त्यांच्या दृष्टीसमोर तोच गोविंद, गोपाळ उभा आहे. आत एक आणि बाहेर एक असे दुभंगलेपण त्यांच्या दृष्टीत उरलेले नाही. त्यांच्या चित्तात तो एक गोविंदच भरून राहिला आहे. त्यांना अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे.

ज्ञानदेवांच्या प्रीतीचा आता एकच विषय आहे. विठ्ठलरूपाने उभा असलेला हा सावळा-श्रीहरी. त्यांचे एकमेव प्रेमास्पद हेच. त्यांच्या जीवीची आवड विठ्ठलाच्या ठिकाणी स्थिर झाली आहे, एकवटली आहे. त्यांची प्रीती आहे शाश्‍वतावर, चिरंतनावर. कुणाला कशाची तर कुणाला कशाची आवड असते. कुणाला आवड असते चिखलातून उगवलेल्या कमळाची तर कुणाला कमळाखालचा चिखल चिवडण्याची. कुणी सूर्योन्मुख होऊन आपल्या पंखातले बळ अजमावून पाहतो तर कुणी उंच भरारी घेऊनही भूमीवरचे नासलेपण न्याहाळत बसतो. परंतु बुद्धी आणि भावना प्रगल्भ झाली की माणूस अस्थिरामागील स्थिराचा, अशाश्‍वतामागील शाश्‍वताचा शोध घ्यायला प्रवृत्त होतो. आहे त्यात मन रमेनासे झाले की एखादा राजपुत्र सुस्वरूप पत्नीचा आणि लाडक्या गोंडस बालकाचा त्याग करतो, हात जोडून उभी असलेली सारी सुखे लाथाडतो आणि शाश्‍वत सत्याचा शोध घेऊन ‘बुद्ध’ होतो. ‘बद्धा’चा ‘बुद्ध’ होणे हेच मानवी जीविताचे सार आहे.

ज्ञानदेवांना बालपणीच सर्वज्ञतेने वरले होते. सिद्धप्रज्ञेच्या लाभाने त्यांंचे मन सारस्वताने दुभत होते. श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या कृपेने आणि आत्मसाक्षात्काराने त्यांचे जीवन उजळून गेले होते. त्यांच्या दृष्टीत शाश्‍वत-अशाश्‍वत असा भेद उरला नव्हता. त्यांच्या समोर जे काही होते ते सारे शाश्‍वताचे सुरूप. खरे तर शाश्‍वत-अशाश्‍वत, सगुण-निर्गुण ही भाषा सामान्यांची आहे, सामान्यांसाठी आहे. अंधार समजल्याशिवाय प्रकाश कशाला म्हणतात ते कळत नाही. अज्ञानाचे रूप समजल्यावाचून ज्ञान कशाला म्हणतात ते कळत नाही. ही मानवी बुद्धीची मर्यादा आहे. म्हणून सामान्याला सगुण दाखवून निर्गुणाची कल्पना द्यावी लागते. आकार दाखवून निराकार समजून घ्यावे लागते. परंतु ज्ञानदेवासारख्या आत्मसाक्षात्कारी योगिपुरुषाची दृष्टी ‘सगुण निर्गुण दोन्हीं विलक्षण। ब्रह्म सनातन विठ्ठल हा॥’ अशी व्यापक झालेली आहे. म्हणून सावळा विठ्ठल त्यांना अत्यंत प्रिय आहे. कारण तो सगुण-निर्गुणाच्या पलीकडे असलेले सनातन ब्रह्म आहे. त्याची आवड क्षणोक्षणी वृद्धिंगत होत आहे. ‘पढिये वो हरि पढिये वो।’ अशा लयबद्ध शब्दांत ज्ञानदेवांनी आपल्या जीवीची आवड व्यक्त केली आहे. श्रीहरीचे देखणे रूप, त्याचे सगुणत्व, मदनाला मोहित करणारी त्याची मोहनशक्ती आणि त्याला पाहिल्यावर झालेली भावावस्था यांचे नेटके चित्रण ज्ञानदेवांनी या अभंगात केले आहे.


@ शे. दे. पसारकर
1997

Thursday, January 3, 2019

ज्ञानदेवांच्या अभंगाचे विवरण 

५. सगुण निर्गुण एकु गोविंदु रे



तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।
सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥
अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति नेति नेति म्हणती एकु गोविंदु रे ॥२॥
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारु म्हणों की निराकारु रे ।
आकारु निराकारु एकु गोविंदु रे ॥४॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।
दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥
तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे ।
व्यक्त अव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥
निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव बोले ।
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥७॥
भावार्थ
श्रीहरी, तुला सगुण म्हणावे की निर्गुण रे? विचार केल्यावर जाणवते की, सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांत तूच एक गोविंद आहेस.(१) तू अनुमानाचा विषय नाहीस, अनुमान करून तुला जाणता येत नाही. वेदांनीसुद्धा ‘न इति, न इति’ असे म्हणत एका गोविंदाकडेच निर्देश केला आहे.(२) तुला स्थूल मानावे की सूक्ष्म रे? स्थूल-सूक्ष्म या दोन्हींत तूच एक गोविंद आहेस.(३) तुला साकार म्हणू की निराकार? साकार-निराकार दोन्ही रूपांत तूच एक गोविंद आहेस.(४) तुला दिसणारा मानू की न दिसणारा? परंतु दिसणार्‍या (दृश्य) आणि न दिसणार्‍या (अदृश्य) या दोन्ही रूपांतील गोविंद तूच एक आहेस.(५) तुला व्यक्त म्हणावे की अव्यक्त रे? व्यक्त-अव्यक्त रूपांत तूच एक गोविंद व्याप्त आहेस.(६) श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ज्ञानदेव सांगतात- हा बाप, रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल सर्वत्र व्याप्त आहे.(७)

विवरण
ज्ञानदेव या अभंगात जणू परमात्म्याशी बोलत आहेत, संवाद करीत आहेत. एका अंगाने हा परमात्म्याशी संवाद आहे तर दुसर्‍या अंगाने हा स्वतःशी संवाद आहे. एखादे गीत जुळवल्यावर ते ओठातल्या ओठात गुणगुणत राहावे, तसे ज्ञानदेव जणू स्वतःशी बोलत आहेत. ते स्वतःच प्रश्‍न उपस्थित करतात आणि त्याचे उत्तरही स्वतःच देतात. सगुणात निर्गुणाचा, स्थूलात सूक्ष्माचा, साकारात निराकाराचा, दृश्यात अदृश्याचा आणि व्यक्तात अव्यक्ताचा घेतलेला हा शोध आहे. सगुण आणि निर्गुण मिळून परमात्म्याचे रूप परिपूर्ण होते, अशी ज्ञानदेवांना प्रचीती आली आहे. श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने आलेला हा एकत्वाचा अनुभव ज्ञानदेव या अभंगात कथन करतात. नाथपंथातली निर्गुणोपासना आणि विठ्ठलपंथातली सगुणोपासना यांचा मनोज्ञ संगम या अभंगात झालेला आहे.

ज्ञानदेव नाथसंप्रदायाचे दीक्षित आहेत. काश्मीरी शैवाद्वैतातील विचारधन परंपरेने त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे. वेदान्त तत्त्वज्ञानात जग हा परब्रह्मावरील विवर्त आहे, असे मानले जाते. विवर्त म्हणजे आभास. अंधारात दोरी सापासारखी भासते, पण ती साप नसते. साप हा दोरीवरील विवर्त (आभास) होय. त्याप्रमाणे हे जग परब्रह्मावरील विवर्त आहे. म्हणजे हे जग मुळात परब्रह्मच आहे, परंतु त्याचे आपण पाहतो ते रूप खरे नसून मिथ्या आहे. शंकराचार्यांनी ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ या श्‍लोकात हेच सांगितले आहे. ज्ञानदेवांना मात्र जग मिथ्या आहे हे मान्य नाही. जग हा तर परतत्त्वाचा विलास आहे, क्रीडा आहे. अलंकार सुवर्णापासून निर्माण होतात, परंतु त्याचे सोनेपण भंगत नाही. अलंकार करण्यापूर्वी ते जसे सोने असते तसेच अलंकारात परिवर्तित झाल्यावरही असते. अलंकार हा सोन्यावरील आभास (विवर्त) नव्हे, तर ते सोन्याचेच अधिक सुघटित देखणे रूप आहे. त्याप्रमाणे दृश्य जग हे परब्रह्माचेच रूप आहे, ते मिथ्या नाही; असे ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान आहे. त्यांचा अनुभवदेखील तसाच आहे.

ज्ञानदेव जेव्हा विश्‍वाकडे पाहतात तेव्हा त्यांना विश्‍वातून परब्रह्मच अभिव्यक्त होताना दिसते. परमात्मा विश्‍वरूप आहे, विश्‍व हे त्याचेच रूप आहे. परमात्मा जसा सत्य, शिव आणि सुंदर आहे तसेच हे विश्‍वदेखील सत्य, शिव, सुंदर आहे. जग हे मुळात पवित्र आणि सुंदर आहे. ते कधी अपवित्र आणि असुंदर दिसत असेल तर ती माणूसप्राण्याची करणी होय असे समजावे. दारिद्र्य आणि विषमता काही सुंदर नाही. पण ती ईश्‍वरनिर्मित, निसर्गनिर्मित नाही. जेव्हा एक मनुष्य अधाशीपणे आपल्या ताटात अधिक वाढून-ओढून घेतो तेव्हा तो दुसर्‍याला उपाशी ठेवत असतो. जेव्हा एखाद्या कपाटात हौसेखातर वस्त्रांचे ढिगारे जमलेले असतात तेव्हा दुसरीकडे कुणी मायबहीण विरलेल्या वस्त्रांतून आपली लाज कशीबशी झाकत असते. एका बाजूला जेव्हा गगनचुंबी इमारती उभ्या राहत असतात त्याचवेळी दुसर्‍या बाजूला हळूहळू झोपडवसाहतींची वाढ होत असते. परमात्म्याची प्रकृती (निसर्ग) संतुलन राखत असते, परंतु उपाशी मनाची माणसे मात्र आहे त्यात समाधान न मानता असंतुलन करीत असतात.

मानवनिर्मित दारिद्र्याची आणि विषमतेची झळ ज्ञानदेवासारख्या योगिराजालाही लागली. परंतु त्याबद्दल कुठेही त्यांनी शब्द उच्चारला नाही. आत्मरंगी रंगलेल्या त्या महात्म्याच्या लेखी या सामान्य गोष्टींना काय महत्त्व होते! ते तर श्रीविठ्ठलाचे सगुण-निर्गुण रूप न्याहाळण्यात तन्मय झालेले होते. त्या निराकाराची विश्‍वातली समग्र साकार रूपे पाहून अंतर्यामी हेलावत होते आणि त्या विश्‍वरूपालाच ‘तुला सगुण म्हणो की निर्गुण रे’ असा प्रश्‍न विचारत होते.

खरेच तो सगुण आहे की निर्गुण? सगुण-निर्गुण हे शब्द आपल्या कानांवर नित्य पडत असतात. परंतु त्यांचा अर्थ आपल्याला माहीत असतोच असे नाही. सांख्य तत्त्वज्ञानाने सत्त्व, रज आणि तम असे तीन गुण मानलेले आहेत. सांख्यांनी संपूर्ण विश्‍वाची पुरुष आणि प्रकृती अशी विभागणी केली आहे. पुरुष म्हणजे आत्मा, चेतनतत्त्व. प्रकृती म्हणजे सर्व दृश्य विश्‍व, जडतत्त्व. प्रकृती त्रिगुणात्मक असते म्हणजे सत्त्व, रज, तम या गुणांनी युक्त असते. विश्‍वातल्या प्रत्येक वस्तूत हे गुण असतात. परंतु आत्मा मात्र या गुणांच्या पलीकडे असतो, गुणातीत असतो, निर्गुण असतो. थोडक्यात सांगायचे तर दृश्य विश्‍व हे सगुण आहे, तर विश्‍वापलीकडले परतत्त्व निर्गुण आहे.

‘गुण’ या शब्दाचे आणखी एक स्पष्टीकरण देता येते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय आहेत. तसेच ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या ठिकाणी असलेले गुणदेखील आहेत. हे जग म्हणजे पंचमहाभूतांचा मेळ, संगम. पृथ्वीच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच गुण असतात. पृथ्वीत शब्दगुण आहे. भूगर्भात हालचाल होताना तिचा शब्द ऐकता येतो. तिला स्पर्श करता येतो, ती डोळ्यांना दिसते, तिच्यात रसगुण आहे. सार्‍या कडू-गोड वनस्पती तिच्यातून उगवतात आणि पहिला पाऊस पडताच मातीचा गंध दरवळतो. म्हणजे तिच्यात गंधगुण आहे. याप्रकारे पृथ्वीच्या ठायी पंचगुण आहेत. यापुढील भूतांत एकेक गुण कमी होत जातो. आप म्हणजे जल. जलात शब्द-स्पर्श-रूप-रस हे चार गुण आहेत. तेजात शब्द-स्पर्श-रूप हे तीन गुण आहेत. वायूत शब्द-स्पर्श हे दोन गुण तर आकाशात फक्त शब्द हा एकच गुण आहे. अशाप्रकारे पंचमहाभूते सगुण आहेत. परंतु आकाशापेक्षाही व्यापक असलेल्या परब्रह्मात मात्र एकही गुण नाही. तो निर्गुण आहे. याचा अर्थ हे पाचभौतिक विश्‍व सगुण आहे तर त्यापलीकडे असलेला परमात्मा निर्गुण आहे.

हे अर्थ समजून घेतले की मग पुढचे सारे सोपे होते. विश्‍व सगुण आहे आणि परमात्मा निर्गुण आहे. परंतु सोन्याचेच अलंकार होतात त्याप्रमाणे किंवा सागरावर लाट उसळली तरी ती सागरच असते त्याप्रमाणे विश्‍व हे परब्रह्माचे रूप आहे. सगुण-निर्गुण हा मुळातला भेद नाही. ते तर पाहण्यातले अंतर आहे. परमात्म्याकडे आपण जग म्हणून पाहतो तेव्हा तो जगद्रूपात दिसतो आणि परब्रह्म म्हणून पाहतो तेव्हा अंतर्बाह्य तोच व्यापून राहतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपांत गोविंद, एकच परतत्त्व व्यापून राहिलेले आहे.

हा गोविंद अनुमानाने जाणता येत नाही. अनुमान हे एक ‘प्रमाण’ आहे. ‘प्रमाण’ म्हणजे ज्ञानाचे साधन. प्रत्यक्षप्रमाण, अनुमानप्रमाण आणि शब्दप्रमाण अशी तीन मुख्य ‘प्रमाणे’ आहेत. डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणे हे ‘प्रत्यक्षप्रमाण’ होय. प्रत्यक्ष दिसणार्‍या वस्तूवरून दुसरी वस्तू जाणणे हे ‘अनुमानप्रमाण’ होय. धूर पाहून तेथे अग्नी असला पाहिजे, हे अनुमान आहे. एखाद्या व्यक्तीने काही पाहून, जाणून शब्दांत सांगितले तर त्याचे शब्द हे शब्दप्रमाण ठरते. वेदांचे शब्द आणि संतांचे अनुभवजन्य बोल म्हणजे शब्दप्रमाण. ज्ञानदृष्टी लाभली तर गोविंद प्रत्यक्ष दिसतो. तो अनुमानाचा विषय नाही, तर्काचा विषय नाही. अनुमान न पाहिलेल्या वस्तूबद्दल केले जाते. येथे तर सगुणरूपाने तो डोळ्यांपुढे साक्षात् उभा आहे. त्याच्याबद्दल अनुमान कशाला करायचे? एका आधुनिक कवीने म्हटले आहे, तू नाहीस तर वसंतातून कोण फुलतो? दवबिंदूंतून कोण झगमगतो? अवतीभोवती हेलावणार्‍या जनसागरातली असंख्य रूपे तुझी नाहीत तर कोणाची? ज्ञानदेव हेच सांगत आहेत. तो अनुमानाचा विषय नाही आणि त्याच्याबद्दल अनुमान करण्याची आवश्यकता नाही. वेदांनी देखील त्याच्या रूपाचा शोध घेताना ‘न इति न इति’- अजून संपले नाही- असे म्हणून त्याच्या समग्र, विराट रूपाकडे बोट दाखवले आहे.

त्याला स्थूल म्हणावे की सूक्ष्म? स्थूल सूक्ष्मावर उभे असते. इमारत दिसते, पण ती न दिसणार्‍या पायावर उभी असते. तसे हे स्थूल विश्‍व सूक्ष्म रूपावर उभे आहे. आकारामागे निराकार आहे, दृश्यामागे अदृश्य आहे, व्यक्तामागे अव्यक्त आहे आणि स्थूल-सूक्ष्म, आकार-निराकार, दृश्य-अदृश्य, व्यक्त-अव्यक्त हे सर्व मिळून एक तूच गोविंद विद्यमान आहेस. तुझ्यावाचून काहीही अस्तित्वात नाही. श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ज्ञानदेवांना विश्‍वव्यापक गोविंद म्हणजेच श्रीविठ्ठल होय, अशी अनुभूती आली आहे. या अभंगात ज्ञानदेवांनी आपल्या समोर दोन रूपे उभी केली आहेत. सगुण-स्थूल-साकार-दृश्य-व्यक्त असे विश्‍व आणि निर्गुण-सूक्ष्म-निराकार-अदृश्य-अव्यक्त असा परमात्मा. विश्‍व आणि परमात्मा यांचे एकरूपत्व त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे स्पष्ट केले आहे. परमेश्‍वरावर प्रेम करणे म्हणजे विश्‍वाचा तिरस्कार करणे नव्हे. हे जग असत्य, अशिव, असुंदर नव्हे. तर ते परमात्म्याप्रमाणेच सत्य, शिव, सुंदर आहे. कारण जग म्हणजे दृश्य परब्रह्मच आहे असा ज्ञानदेवांना साक्षात्कार झालेला आहे. जग तिरस्करणीय नसून प्रेमास्पद आहे, असे प्रतिपादन करणारे ज्ञानदेव हे महाराष्ट्रातील पहिले संत आहेत.
@ शे. दे. पसारकर
1997